सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

अनुभव_एका_पावसाचा

 अनुभव_एका_पावसाचा

नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं,
"अगं, किती छान वाटतोय बंगला आता. एकदम प्रसन्न. उंचावलेला दर्शनी भाग आणि नवीन मातीत तरारून उठलेली रंगीबेरंगी फुलांची झाडं. बघूनच मन मोहवून टाकतायत. थोडावेळ बाहेरच झोक्यावर गप्पा मारत बसूया का? इथेच मन सुखावतेय बघ."
"हो बसूत की. आम्हालाही आता त्या दुखर्या आठवणीतून बाहेर आल्यासारखं वाटतंय. नुकतंच घराचं आतलं बाहेरचं रंगकाम संपलंय. महिनाभर काम सुरू होतं ग. संध्याकाळी दमायला व्हायचं पण सकाळ पुन्हा नव्या दमाने उजाडायची. वाईट आठवणींचा ओरखडा, नवीन रंग, नवीन बाग पाहून थोडासा धूसर होत चाललाय आता."
"खरं आहे गं. पावसाळा सुरू झाला की सगळ्या जुन्या आठवणी दाटून येत असतील ना? फारच दूर असल्यामुळे मला मदतीला येता आलं नाही याचं नेहमीच वाईट वाटत होतं."
"हरकत नाही गं. सुरवातीचे दिवस भयाण शांततेत आणि कामात गेले. असा थरार यापूर्वी कधी अनुभवला नव्हता. लग्न झाल्यापासून कधी घराची इतकी उलथापालथ झाली नव्हती. ते दिवस आठवले तरी अंगावर काटा येतो."
"तुला अजून सगळं जसंच्यातसं आठवत असेल ना? मी तर फक्त फोनवरून ऐकलं तुमच्या सगळ्यांच्या तोंडून."
"चल घरात, मी एकेक खोलीतलं त्या दिवसाचं दृश्य सांगते तुला."
"कधी कधी काय होतं की, वास्तवात आलेलं अरिष्ट स्वीकारून पर्याय शोधावा लागतो. तब्बल ५१,५२ वर्षांपासून सजवलेलं, सांभाळलेलं घर एका फटक्यात भेसूर बनत असतांना पाहून आपली असहायता, हतबलता अधिकच तीव्रतेने जाणवते. पण कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याचे प्रयत्न आपोआप होत गेले."
तावरे कॉलनीत रहाणारी सुनीता सांगत होती....
बुधवार, २५ सप्टेंबर २०१९ ... कित्येक दिवसांपासून पाऊस चालूच होता. कधी रिमझिम तर कधी मुसळधार.. त्या दिवशी संध्याकाळी कर्वेनगरला सुहासिनीकडे/नणंदेकडे गेलो होतो. तिच्या मुलाचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी तो आणि सून परदेशी डॉक्टरेट करायला जाणार म्हणून त्यांना निरोप द्यायला गेलो होतो. रात्री नऊच्या दरम्यान परत निघालो. मुसळधार पाऊस सुरू होता. थांबायचं नावच घेत नव्हता. रस्तोरस्ती पाणी साचलेलं दिसत होतं. मित्रमंडळ चौकात जरा जास्तच पाणी होतं. एकेक गाडी कशीबशी बाहेर काढत होते लोक. पावसाचा जोर अजूनच वाढत होता. घराजवळ आलो तर दारात फुटभर पाणी साचलेलं. ५२ वर्षांपूर्वी बांधलेला बैठा बंगला फक्त दोन पायर्या उंची असलेला.. पायर्यांवर पाणी आलेलं. अजून पाऊस वाढला तर कदाचित घरात पाणी येऊ शकतं असा विचार करून दारातील, व्हरांड्यातील जमिनीवरच्या वस्तु, चपला वर ठेवल्या. इतक्या वर्षात फक्त एक दोनदा असं उंबर्यातून आत पाणी डोकावलं होतं. तसंच होईल असं वाटलं. पुढच्या मागच्या लोखंडी दरवाजाला खालच्या बाजूला तीन फुट तरी पत्रा होता आणि वर जाळी. सुरूवातीला पाणी अगदी फटीतून आत येऊ लागलं. काय होईल, किती पाणी वाढेल याचा विचार करीत असतांनाच, प्रचंड पाण्याचा लोंढा घराच्या मागच्या बाजूने खिडक्या, दरवाजांमधून आत आला. हा पाण्याचा हल्ला अनपेक्षित होता. कुठे जायचं सुचत नव्हतं म्हणून मी श्रीकांतला म्हणत होते, "अरे आपण माझ्या मैत्रिणीकडे जाऊ तिचं घर दुमजली आहे." श्रीकांत मला शांत करत म्हणत होता, "अगं आपलं पण घर दुमजलीच आहे ना?" खरं तर तो पाण्याचा लोंढा आमच्याकडे येताना पाहून मला घरातून बाहेर पळावं असंच वाटत होतं. मागून पाणी आम्हाला ढकलत होतं आणि आम्हाला मागच्या बाजूलाच जाणं भाग होतं. कारण वरच्या मजल्यावर जायचा जिना मागे असल्याने आम्ही सर्वजण घाबरून मागच्या खोलीकडे निघालो. तिथपर्यंत कसंबसं एकमेकांना सांभाळत जिना गाठला. तोपर्यंत जिन्याच्या चार पायर्या पाण्याखाली गेल्या होत्या. आता सामानाचा विचार सोडून जीव वाचवणं महत्वाचं वाटलं. तरी जाता जाता महत्वाची कागदपत्रांची बॅग, काही कपडे, मोबाईल घेऊन जात होतो. माझ्या अचानक नजरेत भरली ती मी गणपतीत केलेली सजावट, ती पाण्यात वाहून जायला नको म्हणून तीही उचलली. तसं पाहिलं तर जेमतेम साठ रुपये खर्च आलेली ती सजावट पण त्यासाठी माझे काही दिवस खर्ची पडले होते ना? मग ती खराब होऊन कसं चालेल? त्याचवेळी त्याशेजारी असलेला माझ्या गाण्याच्या सरावासाठी सदैव सज्ज असलेला दहा हजाराचा कराओके मात्र दिसला नव्हता मला. वरच्या मजल्यावर एक प्रशस्त हॉल आणि एक बेडरूम असल्याने सर्वांची म्हणजे श्रीकांत, मी, मेधा आणि आई, चौघांची सुरक्षित सोय होणार होती. ओल्या कपड्यांनीशी वर पोचेपर्यंत पाणी अजूनच वाढलं होतं. गच्चीवरुन पहाता पाण्याचा प्रवाह आपल्याबरोबर कहयात येतील त्या गोष्टी, जनावरे वहात आणत होता. ते भयानक रुद्र रूप पहात असतांनाच जाणवलं ते शेजारचं गुणे काकूंचं कुटुंब पाण्यात असलेलं. त्यांना तर वर आडोसा घ्यायला खोल्या पण नाहीत. इतक्या वर्षांचं सख्य शांत बसू देत नव्हतं. त्यांना इकडे बोलावलं. छातीपर्यन्त, चार फुट आलेल्या पाण्यातून साखळी करून सगळेजण त्यांच्या घरातून निघाले. त्यांची आई उंचीला कमी असल्यानं तिच्या गळ्यापर्यंत पाणी येत होतं. त्यांच्या हातातली औषधाची पिशवी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. वर आल्यावर ओले कपडे बदलायला घेतलेली कपड्यांची पिशवी भिजून गेली. सगळे दारात तर पोचले पण दारच काही केल्या उघडेना. कारण पाण्याचा प्रवाह आतल्या दिशेने जोर करत होता. बाहेरून ते चारजण ढकलत होते, आम्ही खाली जाऊन आतून तीनजण ओढत होतो, पण आतल्या बाजूंनी असलेला पाण्याचा जोर काही केल्या त्या बंद दाराला हलू देत नव्हता. अखेर महत्प्रयासाने कशीबशी दाराला फट तयार झाली आणि आधी पाणी जोराने बाहेर जाऊ लागले. त्यांना जरा धडपडायला झालं पण एकाने दार घट्ट धरून ठेवल्याने आत येता येईल अशी परिस्थिति निर्माण झाली. तोपर्यंत दारातून, फटीतून पाणीच बाहेर जातच होतं. दार उघडल्यावर बाहेर साठलेल्या कचर्याने पण आत बाहेर संचार सुरू केला. सगळे आत आल्यावर जोर लावून दार बंद केलं आणि एकमेकांना सांभाळत अखेर सर्वजण वरच्या मजल्यावर पोहोचलो. सुन्न मनाने कोसळत असलेला पाऊस पहाण्यावाचून पर्याय नव्हता. इतकं पाणी असं अचानक कसं आलं याची चर्चा करीत राहिलो. नाही नाही त्या शंका मनात येत होत्या. वीजप्रवाह खंडित केला गेला होता. गच्चीवरून पाण्यातून वहात जाणारं सामान, प्राणी दिसत होते. दाराशी दोन गाड्या उभ्या होत्या. होंडा सिटी गाडीत ठिणग्या येत असलेल्या दिसत होत्या. तितक्यात एक सिलेंडर वहात येऊन गाडीला खेटून थांबला. श्रीकांतला जरा टेंशन आलं, या ठिणग्या थांबल्या नाहीत आणि सिलेंडर मधून गळती सुरू झाली तर???? पण नशिबाने तसं काही घडलं नाही.
घाबरून शेजारून आलेलं गुणे कुटुंबिय अंग कोरडं करून कपडे बदलून सतरंजीवर शांतपणे निजले होते. मी, मेधा आणि श्रीकांत मात्र सुन्न होऊन गच्चीवरून भयाण नजारा बघत होतो. मधेच एक स्टील कपाट, एक डुक्कर येऊन गाडीला खेटून राहिलं. पाणी येणं सुरू होताच मेधाच्या मांजरानं खिडकीबाहेर पाण्यात उडी मारली होती. तिला मांजराची काळजी सतावत होती. दुसर्या दिवशी दुपारी मांजर घरात आलं तेव्हा तिच्या जीवातजीव आला.
श्रीकांतनी रात्री अकरा नंतर बहिणींना, सुहासिनीला कर्वेनगरला आणि धनश्रीला सहकारनगरला फोन केले. त्यांनी घेऊन जायला येऊ का अशी विचारणा केली पण त्या येणार तरी कशा आणि कोणत्या रस्त्यानं? सगळे रस्ते वहात्या नदीत रूपांतरीत झालेले. पाण्याच्या अतिप्रचंड दाबाने पूल वाहून चालले होते असं कळलं.
तावरे कॉलनीच्या मागच्या बाजूला आंबिल ओढा होता. ओढ्याचं पाणी ओढ्याची आणि कॉलनीची भिंत तोडून इतरत्र घुसलं होतं. रात्री एकच्या दरम्यान पावसाचा जोर कमी झाला. पाच सात जणांचं एक टोळकं ओरडत येत होतं. अंधारात ते कोण आहेत आणि काय ओरडत आहेत ते आधी आम्हाला नीटसं कळलं नव्हतं. मग कळलं की ते, 'कोणाला मदत हवी का मदत?' असं ओरडत होते. आमच्या शेजारच्या घरतून आवाज आला,' आम्हाला मदत हवी आहे.' ते तिकडे वळले. शेजारचं घर अजून खाली असल्यानं त्यांच्या घरात पाणी आल्यावर मुली कपाटावर आणि आजी कॉटवर अडकले होते, त्यांना त्या मुलांनी उचलून सुखरूप वरच्या मजल्यावर नेऊन सोडलं.
आम्ही वरच्या हॉलमध्ये गाद्या पसरल्या होत्या. पण डोळ्याला डोळा लागणं शक्य नव्हतं. अखेर पहाटे चारच्या दरम्यान पाणी बर्यापैकी ओसरलं होतं. पाऊस सुरू झाला तेव्हा वीज पुरवठा खंडित झाला. इन्व्हर्टर पाण्यात भिजत राहिल्यानं त्यानं काम करणं बंद केलं. उजाडण्याची वाट पहात गादीला पाठ टेकली. सकाळी उठून घर साफ करणं क्रमप्राप्त होतं त्यासाठी थोडा आराम गरजेचा होता.
खाली येऊन सकाळी पाहिले तर....
जिना उतरतानाच दिसत होता तो एखाद फुट उंच चिखल आणि त्यात अस्ताव्यस्त पसरलेल्या वस्तु. प्रत्येक खोलीत होत्याचं नव्हतं झालं होतं. रात्री मेधाच्या खोलीतील लाकडी भक्कम पलंग निश्चितच पाण्यावर हेलकावे खात असणार. कारण हेलकाव्यांबरोबर त्यावर असलेल्या गाद्या चिखलाने डाय केल्याप्रमाणे माखून निघाल्या होत्या. शेजारी असलेल्या टेबलवरील कॉम्प्युटर आणि CPU च्या बॉक्समधून एकेक थेंब पाणी जमिनीवरच्या गाळात टपकत होते. बाथरूम मधून अर्धवट चिखल भरलेल्या प्लॅस्टिक बादल्या बाहेरच्या जागेत येऊन पडल्या होत्या. आईंच्या खोलीत हाताशी असावी म्हणून रॅकमध्ये ठेवलेली अंथरुण पांघरूणं, औषधं, कपडे अस्ताव्यस्त पसरले होते. बेसिनजवळचं वॉशिंग मशीन उभ्याचं आडवं झालं होतं. आईंच्या गुडघेदुखीमुळे देवघर उंच केलं असल्याने देव जागेवरच होते. सगळं घर अस्ताव्यस्त पसरलं होतं पण देवाला वाहिलेलं एक फूल देखील हललं नव्हतं हे आश्चर्य. अजून एक आश्चर्य म्हणजे आईंच्या चप्पल बाहेरच्या व्हरांड्यातून तरंगत येऊन मागच्या खोलीतल्या कपाटावर विराजमान झाल्या होत्या. त्याला कणभर देखील चिखल लागला नव्हता.
सगळ्यांच्याच कपड्यांची खोलीतली कपाटं उघडताच खालच्या तीन कप्प्यात साठलेलं गाळरूपी पाणी बद्दकन काही कपड्यांना घेऊनच बाहेर पडत होतं. किचनमध्ये तर विचारता सोय नाही इतका पसारा. दोन दरवाजे असलेला फ्रीज आडवा उताणा झोपला होता. आतल्या सामानाची जागा केव्हाच चिखलाने घेतली होती. “पतझड मौसम” असतो तेव्हा सगळीकडे झाडांची वाळलेली पानं, पाचोळा पसरतो तशी भांडी इतस्ततः विखुरली होती. डब्यातल्या डब्यातच तपकिरी पाण्याने कणीक भिजवली गेली होती. कडधान्ये डब्यातच भिजत घातली गेली होती. सगळ्या भांड्यांना साबण लावून ठेवतो तसा चिखल फासला गेला होता. हॉलमध्ये सोफा आणि खुर्च्या देखील लाकडी पलंगाप्रमाणे खोखो/कबड्डी खेळून शांत झाले होते. शोकेस मधील शोभिवंत वस्तूंची जागा राडारोडयानं घेतली होती आणि आतल्या वस्तूंना बाहेर फेकलं होतं. त्यातच काचा, वहात आलेले किडे पण होते. व्हरांड्यात बसायच्या दोन सेटी आणि त्यात आत असलेली पेपरची रद्दी हातात देखील धरण्याच्या लायकीची राहिली नव्हती. घर तर चिखलमय झालं होतंच पण बाहेर पाहिलं तर दोन्ही कार चिखलपाण्याने भरून जागेवर उभ्या होत्या आणि दुचाकीने मात्र मान टाकली होती. घराभोवतीचं तारेचं कुंपण चारही बाजूंनी आडवं झालं होतं. दुसरीकडून वहात आलेल्या काही वस्तु कारला भिडून शांत बसल्या होत्या. त्यात एक गोदरेज कपाट, दोन गॅस सिलेंडर, अजून काही प्लॅस्टिक वस्तु कचरा, कपडे होते. आणि एक मेलेलं डुक्कर फुगत चाललं होतं. काही काळानं त्याची दुर्गंधी पसरायला सुरुवात झाली.
सकाळी सकाळी सुहासिनी आणि धनाश्री रणरागिणी/ अष्टभुजेच्या वेशात दारात अवतरल्या. त्या आणि त्यांचे कुटुंबीय बादल्या, झाडू, पोचा गाडीत घालून मिळेल त्या रस्त्याने घरी पोचल्या. गरमागरम नाश्ता, प्यायला पाणी घेऊन आल्याने 'आधी करू पोटोबा मग काढू चिखलोबा' असं म्हणावं लागलं. घराचा नजारा बघून काम कुठून आणि कसं सुरू करावं कोणालाच कळत नव्हतं. फुटभर चिखलात काहीही, कोणीही असण्याची भीती होतीच. दोघादोघांनी एकेका खोलीचा ताबा घेतला. जमेल तसं घरातला पातळ चिखल बाहेर काढताना महत्वाच्या गोष्टी, सोनं नाणं पण फेकलं जाण्याची भीती होती. गाळात चाचपडत असताना धनश्रीच्या शुभंकरला हाताला काच लागली आणि रक्त येऊ लागलं. त्याला पट्टी बांधून सगळे कामाला लागलो. सुरुवातीला जाण्यायेण्याचा रस्ता साफ केला तरी उघडलेल्या कपाटातून घाण बाहेर येत राहिलीच. खराब वस्तु बाहेर टाकणं हे फार मोठं आव्हान होतं. त्यावेळी पहिल्यांदा जाणवलं, आपण घरात निरुपयोगी पण प्रेमाच्या म्हणून कित्येक गोष्टींचा साठा करून ठेवलेला असतो. कळत असून देखील फेकवत नाहीत अशा वस्तु. त्यादिवशी उपयोगी, निरुपयोगी कित्येक वस्तूंना तिलांजली द्यावी लागली.
कामवाल्यांच्या घरातच पाणी शिरल्याने पहिले दोन दिवस लोकं मिळालीच नाहीत कामाला. दोन दिवस वीज नाही.... प्यायला पाणी नाही. तिसर्या दिवशी चार लोक मिळाले. भिंतींपासून सगळं धुता धुता घर हळूहळू साफ वाटायला लागलं. दोन दिवसांनी भंगारवाले गाडा घेऊन फिरू लागले. कचरा उचलायला गाड्या फिरू लागल्या. कॉलरासारखे आजार पसरू नयेत म्हणून लवकरात लवकर घर स्वच्छ मोकळं करायचा सगळ्यांनी आटोकाट प्रयत्न केला.
रोज माझ्या मैत्रिणी भेटायला येत होत्या. येताना कोणी नाश्ता तर कोणी जेवण आणत होत्या. आयतं खात कामं सुरू होती. दूरदर्शन, बातम्या बघायला, ऐकायला कोणाला वेळ होता? एक दिवस एक मैत्रीण आली आणि माझ्याकडे बघून एकदम रडायलाच लागली. खरं तर तोपर्यंत आम्हाला परिस्थितीचं गांभीर्य इतकं वाटलं नव्हतं. आपत्ती आली मार्ग काढू अशा आवेशात आम्ही होतो. पण तिचं ते रडणं बघून, बाहेरची, ओढ्याकडची परिस्थिती किती कठीण झालीय ते जाणवलं.
हळूहळू मग गाद्या नवीन करणं, सोफा सेटला पॉलिश करून नवीन कुशन करणं, किचन कपाटं नवीन करणं होत गेलं.
जिवापाड जपलेल्या गाड्या क्रेनने उचलून भंगारात देताना मात्र डोळ्यात पाणी तरळलं. गाडी नेताना आठवणीने त्यातल्या गणपती बाप्पांना उचलून घेतलं, नवीन गाडीत विराजमान करण्यासाठी.
गेल्या दोन वर्षात घरात पाणी आलं नाही पाहूनच यावर्षी घराला रंग देण्याचा विचार केला.
दारासमोरचे रस्ते सीमेंटचे होताना छान वाटलं होतं पण तेव्हा ऊंची वाढवलेले रस्ते आपल्यावरचं पावसाचे पाणी न जिरवता बंगल्याकडं ढकलतील हा विचारच आधी मनात आला नव्हता. मागच्या वर्षी बागेत ब्लॉक टाकून आणि माती टाकून ऊंची वाढवली. पाण्याला नाल्यात सुरळीत जाता यावं म्हणून मार्ग केला. दोन वर्षं घरात पाणी न शिरता त्याला दिलेल्या वाटेनं गेलं म्हणून रंगकाम केलं.
चार तासात सगळ्या घरांना वेढा घातलेल्या पाण्याचे उपद्व्याप निस्तरता निस्तरता कितीतरी जुन्या वस्तु भंगारात काढून नवीन वस्तु, उपकरणं घ्यावी लागली.
खरंतर या आपत्तीतून बाहेर पडून नवीन उपकरणं वापरताना नैराश्य मागे टाकून उत्साह वाढत होता हे निश्चित.
जुनं ते सोनं असलं तरी नव्याची नवलाई हवीहवीशी वाटतेच....

विश्व_आदिवासी_दिवस


 विश्व_आदिवासी_दिवस

आज 9 ऑगस्ट 'विश्व आदिवासी दिवस' ...
वर्षभरातल्या ३६५ दिवसांपैकी कित्येक खास विश्व दिवस साजरे केले जातात. काही दिवसांना तर साजरा करायचा दरवर्षी वेगळा विषय दिला जातो. त्याचं घोषवाक्य ठरवून दिलं जातं.
या वर्षी जागतिक आदिवासी दिनाचा विषय “संरक्षणात स्थानिक महिलांची भूमिका आणि पारंपारिक ज्ञानाचे प्रसारण” ही 2022 ची ( Role of local women in conservation and transmission of traditional knowledge ) आहे.
आज मला या विश्व आदिवासी दिवसाबद्दल लिहायला कारणीभूत ठरला तो ६ ऑगस्टच्या लोकसत्तामध्ये आलेला एक लेख. पहिल्या स्त्री भारतीय मानववंश शास्त्रज्ञ मधुमाला चटोपाध्याय जेव्हा अंदमानमधील अज्ञात सेंटिनल बेटावर जातात आणि तिथल्या आदिम जमातीशी संवाद साधतात, त्यात यशस्वी होतात. ही मोहीम खरंच धाडसी आणि कौतुकास्पद म्हणावी लागेल. त्यांच्या या मोहिमेला ३० वर्षं पूर्ण झाली तरी नंतरच्या या ३० वर्षांत पुन्हा अशी मोहीम यशस्वी झाली नाही. अतिशय कौतुकास्पद कामगिरी त्यांच्या या लेखात वाचायला मिळेलच. सोबत त्या लेखाचा फोटो आणि pdf मी जोडत आहेच. फारच रंजक आहे हा लेख.
'निकोबारची नवलाई' लिहीत असताना मी अंदमान निकोबारमधील आदिवासींबद्दल बरीच माहिती जाणून घेतली आणि ती पुस्तकात लिहिली आहेच.
जगाच्या पाठीवर असे अनेकविध आदिवासी अस्तीत्वात आहेत, काही मात्र नामशेष झाले.
जंगलामध्ये वास्तव्य करणाऱ्या मूळ निवासी समुहांनी पर्यावरण जपण्याचे मोलाचे कार्य केले. परंतु समाजाच्या मुख्य प्रवाहात नसल्याने या आदिम जमाती शिक्षण, आरोग्य, रोजगार या सर्वांपासून कोसो दूर राहिल्या होत्या. संयुक्त राष्ट्रसंघटना आणि तिची सलग्न संस्था आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने आदिवासींना ‘इंडिजिनस’ अर्थात देशज, मूळनिवासी असे संबोधावे अशी शिफारस केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनाने जागतिक आदिवासी समुदायाच्या अधिकाराच्या रक्षणार्थ १९९३ हे जागतिक आदिवासी वर्ष घोषित केले होते. आदिवासी हेच पृथ्वीचे मूळनिवासी आहेत आणि ४६१ आदिवासी जमाती भारतात वास्तव्यास आहेत. आदिवासींच्या जातीत आज आणखी काही जाती समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या प्रेरणेने १९९४-२00५ हे ‘आदिवासी दशक’ म्हणून साजरा करण्यात आले. भारतामध्ये प्रामुख्याने चेंचू इरुला, कदार, कोटा या निग्रो, प्रोटो ऑस्ट्रॉलॉईड या वांशिक जमाती केरळ, तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात राहतात. मध्य भारतात बिहार, ओरिसा, मध्य प्रदेश, पं. बंगाल या राज्यामध्ये गोंड, संथाल, भूमजी, हो, ओरियन, मुंडा, कोरवा या प्रमुख जाती वास्तव्य करतात. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दमण-दीव, दादरा, नगर हवेली या राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात भिल्ल या प्रमुख जमातीचे लोक राहतात. या व्यतिरिक्त कोळी, कोकणा-कोकणी, वारली, ठाकूर, कातकरी, आंध्र परधान, कोलाम, कोरकू, माडिया, गोंड, राज-गोंड या जमाती राहतात. या मूळ निवासी आदिम जमातींचे अस्तित्व मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने ९ ऑगस्ट १९९४ या दिवशी International Day of Indigenous People अर्थात विश्व आदिवासी दिवस घोषित केला. त्यावेळेपासून दरवर्षी या दिवसाच्या निमित्ताने या जमातींच्या मुलभूत सुविधा पुरविण्याकडे लक्ष वेधणे व त्या मिळवून देणे याला सुरुवात झाली. (आंतरजालीय माहिती)
आदिवासी म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर डोंगर दर्यात राहणारा, जंगलात राहणारा, उघडा, नागडा असणारा, ओबड धोबड चेहर्याचा, जगाशी कुठलाही संपर्क नसणारा समाज येतो. जगाच्या पाठीवर ज्या माणसाने, ज्या जिवाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिमानव म्हणजेच आदिवासी. आज जगात ज्या काही कला अस्तित्वात आहेत, त्या सगळ्या कलांचा उद्गाता आदिवासी आहे. आदिवासींची लोककला, चित्रकला, नृत्य, वादन, गायन, शिल्पकला याला तोड नाही. आदिवासी आजही आपली उपजीविका जंगलात मिळणार्या रानमेवाव्यावर करीत आहेत. भारतात गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, ठाणे, किनवट, आदिलाबाद (आंप्र.), अंदमान निकोबार या भागात राहणारे आदिवासी बांधव जंगलाच्या जवळच राहणे पसंत करतात. ‘आदिवासी तेथे जंगल, जंगल तेथे आदिवासी’ असल्यामुळे निसर्गातील प्रत्येक वस्तूला ते दैवत मानतात. निसर्गावर त्यांची निस्सीम श्रद्धा आहे.
अतिशय दुर्गम भागात अधिवास असल्यामुळे आरोग्य सुविधा पुरविणे देखील एक मोठे आव्हान आहे. मात्र यात दळण-वळण साधने व इतर तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुख्यत्वे माडिया, गोंड तसेच परधान आदी आदीम जमाती आहेत. आदिवासींची मूळ भाषा आहे, यात माडिया -गोंडी या दोन मुख्य भाषा गडचिरोली जिल्ह्यात आहेत. या जमातीत मुख्य समाज भाषा रुजवताना त्यांची मूळ भाषा असणाऱ्या गोंडी-माडिया आदी भाषांचे संवर्धन कसे होईल. याबाबतही प्रयत्न जाणीवपूर्वक सुरु करण्यात आले आहेत. त्यांच्या रुढी, परंपरा यांची माहिती इतरांना मिळावी यासाठी प्रयत्न होत आहेत.
भाषा हे संपर्काचे सर्वांत मोठे साधन मानले जाते; मात्र एखाद्या समाजातील विशिष्ट वर्गातील महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवले गेल्यास त्यांनी एकमेकांशी संपर्क साधायचा तरी कसा? काही प्रांतातील महिलांपुढे हीच समस्या होती व त्याचे उत्तर त्यांनी आपली स्वतःची भाषा आणि तिची लिपी विकसित करत राहिले. सुरूवातीला पुरुष अन्नाच्या शोधात गेले की बायका दगडाने/ गारगोटीने दगडावर, मातीत चित्रं काढून एकमेकींना संदेश देत असत. हे संदेश देण्यात हळूहळू उत्क्रांती होत गेली आणि भाषा, लिपि तयार होऊ लागली.
मग मैत्रिणीला भेट दिलेले रुमाल, हेअरबॅंड, हातपंखे आणि कमरेच्या पट्ट्यांवर मैत्रीचे संदेश महिला एकमेकींना देत. वृद्ध महिला स्वतःचे आत्मचरित्रात्मक गीत तयार करून आपल्या आयुष्यातील कष्ट किंवा संस्काराचे दोन शब्द पुढील पिढीतील महिलांना सांगत.
निसर्गाच्या सानिध्यात, निसर्ग देईल ते वापरुन, खाऊन जीवन कंठणार्या प्रत्येक जमातीतल्या आदिवासींची बोली भाषा वेगवेगळी आहे. त्यांचे जगण्याचे नियम, रूढीपरंपरा तिथल्या हवामानाला समजून बनवलेले असतात. अनुभवातून तयार झालेले असतात.
आदिवासींची बोली कळत नसली तरी थोड्याफार प्रमाणात त्यांच्याशी संवाद साधता येतो. मध्यंतरी किशोरच्या एका असिस्टंट इंजिनियरची बदली ग्रेट निकोबारला म्हणजेच भारताच्या शेवटच्या दक्षिण टोकाला झाली होती. उत्सुकता म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलायचो. तिथल्या शोंपेन आदिवासींची सद्यस्थिती जाणून घ्यायचो. काही नवीन माहिती मिळायची. या आदिवासींना सरकारने पूर्ण संरक्षण दिलं आहे. ते जर बाजारात आले तर त्यांना काय पाहिजे असेल ते त्यांना दिलं जातं. वस्तूंसाठी पैशांचा वापर अजूनही ते करत नाहीत. आणि हे नक्की, की ते विना मोबदला देखील काही घेत नाहीत. ते जंगलातून येताना केळीचे घड, मध, नारळ घेऊन येतात आणि त्याच्या बदल्यात नवीन वस्तु घेऊन जातात. त्यांना जर कोणी वरण - भात, पराठा - भाजी खायला दिली तर ते फळं, कंदमूळ आणून देतात. हळूहळू ते समाजप्रिय होऊ लागलेत. त्यांनी मतदान करावं म्हणून त्यांना मतदानाची कार्यपद्धती समजावली जाते. अर्थात त्यांना सरकारी निवडणुकीचा उपयोग, अर्थ माहीत नसतोच. त्यांचं राज्य चालततं ते त्यांच्या मुखिया किंवा कॅप्टनच्या सांगण्यावरून.
काही ठिकाणी आदिवासी जमाती टिकून रहाण्यासाठी सरकारी कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून देखील काम करतात. त्यांच्या भागात रस्ते, वीज, पाणीपुरवठा करताना नवीन बांधकाम करताना कधी कधी आदिवासी आक्रमक होतात. तेव्हा पोलिस संरक्षणात अशी कामं करावी लागतात.
तिथला एक विचार करायला लावणारा किस्सा...
दोन वर्षांपूर्वी घडलेला…
आदिवासी जनगणना करत असताना जाणवलं की गेल्या काही वर्षांत या आदिवासींची संख्या वाढत नाहीये. सरकारी अधिकारी कारण जाणून घेत असताना कळलं की, त्यांच्या मुखिया किंवा कॅप्टनने स्वतःच्या ताब्यात, स्वतःच्या देखरेखीसाठी कित्येक स्त्रियांना बंदी बनवून ठेवलंय. आता या स्त्रियांना मोकळं कसं करणार? बेटावरचे सरकारी अधिकारी, सैन्य अधिकारी, तटरक्षकदलाचे अधिकारी सगळ्यांची बैठक होऊन त्यातले काही अधिकारी कॅप्टनना भेटायला गेले. कॅप्टननी आनंदाने आदरातिथ्य केलं. त्यांच्याशी सांकेतिक भाषेत संवाद साधत होते. सुरूवातीला कॅप्टनना कारण कळलं नाही, पण जेव्हा कळलं की ते आपल्या अंतर्गत आयुष्यात ढवळाढवळ करू लागलेत, तत्क्षणी कॅप्टन त्यांच्या अंगावर धावून आले, चिडले, मारायला लागणार म्हणून सगळे अधिकारी जीव वाचवत पळत सुटले.
जगातील सर्वच आदिवासींचे आपले आपले नियम ठरलेले आहेत. आपण त्यात ढवळाढवळ करू शकत नाहीत. जेव्हा त्यांना स्वतःहून वाटेल आपण आधुनिक विचारशैली आचरणात आणली पाहिजे, त्याचवेळी त्यांच्यात बदल घडेल.
आदिवासींमध्येही अनेक स्वातंत्र्यसैनिक होते होऊन गेले. सुधारक बिशप रिचर्डसन, क्रांतिकारक बाबूराव शेडमाके, नारायणसिंह उईके, राघोजी भांगरे , बख्त बुलंद शहा, दलपतशहा, रघुनाथ शहा, विरांगणा राणी दुर्गावती मडावी, कुमरा भीमा, या प्रत्येकाची शासनाने, पाठय़पुस्तक मंडळाने दखल घेतली पहिजे.
आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देताना इतकंच म्हणावंसं वाटतं, 'त्यांच्यासारखं निसर्गावर प्रेम करायला, निसर्ग संगोपन करायला, जपायला शिकूया!!

कै. उषा दातार स्मृति पुरस्कार - अहवाल

कै. उषा दातार स्मृति पुरस्कार  

एक प्रवास मैत्रीचा

साज चढवलेल्या शब्दांचा
पाठीवरल्या कौतुक थापांचा
नवी उमेद देणाऱ्या घडींचा....
एक प्रवास भेटीचा
हळुवार पावसाच्या सरींचा
संध्याकाळच्या आल्हाद गारव्याचा
गप्पांच्या आनंदी शिडकाव्यांचा...
निमित्त काहीही असो, मामबोकर भेटीत आनंद ओसंडून वाहणारच.
यावेळी निमित्त होते, कै. उषा दातार स्मृती पुरस्काराचे.
१८ नोव्हेंबरला सकाळी मला फोन आला. 'नमस्कार, मी अवधूत परळकर बोलतोय. तुमच्या 'निकोबारची नवलाई'ला कै. उषा दातार स्मृती पुरस्कार जाहीर झालाय. १० डिसेंबरला माहिमला आमच्या वाचनालयात पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित केला आहे. तुम्हाला जमेल ना यायला?'
मला क्षणभर काहीच सुचलं नाही. नंतर सर मला, 'तिथे १० मिनिटं बोलावं लागेल... लेखनाकडे कसे वळलात ते सांगा... तुम्ही आधी काय करत होता, नवीन काही लिखाण सुरू आहे का? म्हणजे थोडक्यात पुस्तकात काय लिहीलंय ते सोडून सांगा. कारण पुस्तक आम्ही वाचलंय, आम्हाला आवडलंय म्हणूनच निवडलं.' असं सांगत होते.
त्यातली माहिती सोडून माझ्या आयुष्यातील इतर घडामोडी मला सांगायच्या होत्या..
फोन ठेवला आणि किशोरसमोर बसून मी हसता हसता रडू लागले. आनंदातिशयाने शब्दच फुटत नव्हते. 'काय झालं साग की.' असं तो म्हणत होता पण मी बोलू शकत नव्हते.
फोनवर ऐकताना माझा एक मोठा गैरसमज झाला. कारण ६ महिन्यांपूर्वी मी दुसर्याच वाचनालयाकडे पुस्तक पाठवलं होतं. मी समजले त्यांचाच फोन. बातमी मामबोकरांना सर्वात आधी कळवली. सगळ्यांचे अभिनंदनाचे संदेश वाचून मी हवेत गेले होते. खरी बातमी मग सुषमाने जाहीर केली. उषा दातार स्मृती पुरस्कार माहीम सार्वजनिक वाचनालयातर्फे दिला आहे. पुन्हा अभिनंदन....
मग काय, कुठे जायचं? कुठे राहायचं? कधी जायचं? कोण कोण भेटणार? किती आणि कोणाकोणाचे संदेश, किती प्लॅनिंग बदललं... अखेर शेवटच्या २ दिवस आधी ठरलं, आरोहीला दगदग नको, मग मी आणि बहीण सुहासिनी दोघीच जाऊ.
"अगं, मी हा लोकरीचा बाहुला बनवलाय. आरोहीला आवडेल का? "- सुनवंती.
"राजेश्वरी ताई, माझी आई माहीमला वाचनालयाजवळच रहाते. कार्यक्रम संपला की तू आमच्या घरी नक्की जा." - श्रेया बापट
"नंतर नको, उशीर होईल. मी असं करते आधी फ्रेश व्हायला तुमच्या घरी जाते मग कार्यक्रमाला जाईन."
"माहीम ऐवजी माटुंगा रोडहून जवळ आहे.
हिंदुजा हॉस्पिटलच्या रस्त्यावर आहे. हवं असेल तर लोकेशन पाठवते." - सुषमा
"अगं, मी श्रेयाच्या आईकडे जाईन म्हणते. आयोजनाच्या धावपळीत मी येऊन तुला त्रास द्यायला नको."
"काहीही काय राजेश्वरी, माहीमला येऊन तू माझ्या घरी येणार नाहीस हे काही बरोबर नाही. मी थांबतेय तू येईपर्यंत. आपण एकत्रच जाऊ."
"सायन हॉस्पिटल समोरून चाललोय ग. आता तू सांगतेस तसं येतो."
"फक्त उजवीकडे गंगाविहार हॉटेल दिसेल तिथून सरळ ये.
सर्कलला डावीकडे वळू नकोस. ते गेट बंद आहे.
तिथे लोकमान्य सोसायटी कोणालाही विचारलंस तरी सांगतील."
हो, नाही करत करत अखेर आमची गाडी सुषमाच्या सोसायटीच्या आवारात शिरली.
"मी खाली जाऊन राजेश्वरीला घेऊन येते तोपर्यंत कपात चहा गाळून टेबलवर झाकून ठेव." अशी नवर्याला ऑर्डर सोडून सुषमा खाली आली. हे मला ऐकू आलं कारण दहा मिनिटांपासून आमचा फोन सुरूच होता. तो एकमेकींना समोर बघूनच बंद झाला.
समोर सुषमा छान आकाशी रंगाच्या खानदानी रेशमी साडीत उभी दिसली. खरंच खूप छान दिसत होती.
घरात शिरलो तर चकली, बिस्किटं आणि झाकलेल्या चहाचे कप समोर स्वागतालाच. बायकोची आज्ञा शिरसावंद मानण्यात आली होती. कौतुकास्पद...
जेमतेम पंधरा मिनिटं मिळाली आम्हाला गप्पा करायला. त्यातच मला चार तासांचा प्रवास करून आल्यामुळे आवरायचं होतं. पण भेटल्याचा आनंद इतका होता, की काय तयारी करतेय त्याकडे लक्षच नव्हतं. बरोब्बर पंधराव्या मिनिटाला बाहेर पडलो.
आम्ही ज्या लिफ्टने उतरणार होतो त्या लिफ्टने दस्तुरखुद्द ओरिसाकर वर आले. मी चक्कर येऊन पडणार होते😍😍 - सुषमा
कसलं surprise होतं उल्काचं😄🎉🎊🎉🎊🎉🎊🎊😍😍😍😍
मामबोकर भेटीची सुरुवात मी, सुषमा मग उल्का भेटत झाली. सुहासिनी आणि आम्ही तिघीजणी गप्पा मारत वाचनालयाच्या इमारतीत पोचलो.
सुषमाचे आदरातिथ्य भावले होतेच. ग्रंथालयातील सांस्कृतिक वातावरण, वागण्याबोलण्यातील मोकळेपणा आणि कार्यक्रम परिपूर्ण व्हावा म्हणूनची धडपड खरंच सुखावून गेली.
विशेष म्हणजे ग्रंथालयातील कर्मचारी वर्गाने आपणहून कष्ट घेऊन सजावट उत्तम केली ह्याचे फार कौतुक करावेसे वाटते.
चहापान, एकमेकांची ओळख होताहोताच मामबोकर सुनवंती आणि श्रद्धा सोहनी समोर आल्या. माझी खरंच खूप द्विधा मनस्थिती झाली. सुनवंतीने आल्याआल्याच माझ्या हातात आरोहीसाठी एक बाहुलीची बॅग दिली. गंमत म्हणजे तिने तयार केलेला बाहुला कमी वाटून तिच्या अहोंनी अजून एक छान गोंडस बाळ आणून दिलं. अगदी कोडकौतुकच...
जाताना मला एका मैत्रिणीने सांगितलं होतं, 'माहीमचा हलवा घेऊन ये.' मला तर त्यासाठी वेळ घालवायचा नव्हता पण श्रद्धाने ते ऐकलं बहुतेक. ती माहीमचा चविष्ट, शुद्ध तुपातला हलवा, सिंगापूरची चॉक्लेट, एक गळ्यातल्याचा सेट असा भरगच्च आहेर घेऊन आली. सोहळ्याची जाणीव अजूनच तीव्र झाली...
मी पहिल्यांदाच भेटत होते पण तसं अजिबात जाणवलं नाही. ही खरंतर मामबोची खासियत. पहिल्यांदा भेटलो तरी खूप जुनी मैत्री असल्यासारखं वाटतं.
डोंबिवलीहून किशोरचे मित्र विलास आणि मीनल कुलकर्णी आले होते. श्रेयाच्या आई प्रज्ञाताई आल्या होत्या. मला सगळ्यांशी गप्पा मारायच्या होत्या पण सगळीकडे उत्साहच इतका होता की बोलायला शब्द फुटत नव्हते. माझं आपलं एकच पालुपद सुरू होतं, "खूप छान वाटलं तुम्ही आलात पाहून."
चहापान, ओळख इतरांशी गप्पा करत घड्याळाचा काटा कार्यक्रमाची वेळ दाखवू लागला.
शैलाताई, अवधूत सर सगळ्यांशी छान गप्पा मारता आल्या.
कार्यक्रमाची सूत्रं सुषमाने अतिशय उत्तमप्रकारे सांभाळली. माहीम वाचनालयाची माहिती, कै. उषा दातार यांच्या लेखनाविषयी सांगून मग पुरस्काराबद्दल... समोर कै. उषा दातार यांचा मुलगा आणि सून बसले होते. मला खरंच खूप कौतुक वाटलं त्यांचं. आईची स्मृती जागवत नवोदित लेखनाला प्रोत्साहन देण्याचं खूप छान कार्य ते करत आहेत.
२०१८-१९ चा पुरस्कार श्रीमती सरिता आव्हाड यांना 'हमरस्ता नाकारताना' या पुस्तकाबद्दल जाहीर झाला. सरिता ताईंच्या आयुष्यातही बर्याच घडामोडी, वळणं आहेत. लेखिका कै. सुमती देवस्थळी यांची मुलगी, आंतरजातीय लग्न, पुरुषप्रधान संस्कृतीत वाढलेला नवरा, नवर्याचा कॅन्सरने झालेला मृत्यू आणि आता दोघांच्या संमतीने करंदीकरांच्या बरोबर एकत्र रहाणे. साठी पार केलेल्या, जोडीदाराच्या नसण्याने एकट्या पडलेल्यांचे मेळावे भरवणे, शक्य झाल्यास जोडीदार मिळवून देणे, अशाप्रकारचा कोतुकास्पद उपक्रम सध्या त्या राबवत आहेत. या सगळ्या घडामोडी अतिशय उत्तमप्रकारे त्यांनी 'हमरस्ता नाकरताना' या पुस्तकात मांडल्या आहेत. हे पुस्तक लिहिण्यामागची कथा त्यांनी अतिशय प्रभावीपणे सांगितली.
मग वेळ आली माझी. आधीच सगळ्यांच्या केलेल्या कौतुकाने, आजूबाजूच्या सजावटीने आणि रेड कार्पेट वरून एकेक पावलं टाकत येताना माझे डोळे दीपले होते. त्यात सुषमाने केलेल्या गोड निवेदनाने अंगावर मूठभर मांस चढलं. पोडियम समोर उभी तर राहिले, पण मनात ठरवलेली सुरुवात पुर्णपणे विसरून गेले होते. बोलताना परळकर सरांचे शब्द आठवले, पुस्तकात लिहिलेलं सांगायचं नाही. बोलता बोलता गाडी पुस्तकाकडं चालली ती वेळीच थांबवली आणि पुस्तकाव्यतिरिक्त बोलून माझं भाष्य संपवलं.
प्रमुख पाहूण्या म्हणून डॉ. अरुणा दुभाषी होत्या. भाषेवर प्रभुत्व म्हणजे काय ते त्यांना ऐकताना जाणवतं. त्यांनी बदलते कथालेखन, लेखक यांच्यावर केलेले भाष्य म्हणजे दुधातली साखरच. माझ्या fb wall वर share केलेलं त्यांचं भाषण नक्कीच ऐका.
अखेर श्री. अवधूत परळकर सरांनी पुरस्काराचे स्वरूप सांगायला सुरुवात केली. "पूर्वी आम्ही अगदी मामुली रक्कम देत होतो. यावर्षीपासून पुरस्काराची रक्कम थोडी वाढवतोय. पूर्वीच्या १०,००० रू. ऐवजी यावर्षी २५,००० रू, प्रशस्तिपत्रक आणि स्मृतिचिन्ह देत आहोत."
हे ऐकताच सुखद धक्का तर बसलाच पण डोळ्यात पाणी जमा झालं.
शैलाताई, अवधूत सर, मेधाताई आणि सुषमा या सगळ्यांची साहित्यसेवेची धडपड, त्याविषयीची सखोल जाणीव, माझ्यासारख्या नवोदित लेखिकेला दिलेले प्रोत्साहन, यासाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.
कार्यक्रम सुरू असताना उल्का एकेक फोटो काढून मैत्रिणींना पाठवत असावी.
नंतर त्यावर आलेले अभिप्राय म्हणजे दुधात साखरच...
किती गोडुल्या सगळ्या ! - वैशाली ताई
आऽऽ ...किती कळा येताहेत पोटात...आईईई!! 😀😀 - उषा
मस्त दिसतायत सगळ्याजणी👌👌- उषा
वाह, मस्त सोहळा, छान फोटो 👌😍- रजनी
राजेश्वरी... खूप छान वाटतंय यार तुझ्यासाठी....soo happy for you dear 💕 लिखते रहो! खुश रहो!👍- उषा
श्रद्धाही दोन वर्षांनी भेटली. छान वाटलं तिला भेटून. - उल्का
काय बोलल्यात अरुणाताई, आम्ही मंत्रमुग्ध! - सुषमा
"मस्त मस्त. फोटो बघून दुधाची तहान... असो. - मधू
एकत्र फोटो, सह्या, गप्पा आणि चहापान...
केतकर केटरर यांचे बॉक्स प्रत्येकाला देण्यात आले. डोळे दिपवून टाकणार्या या कार्यक्रमात पोटच्या भुकेची जाणीवच नव्हती. मी म्हटलं, आम्ही दोघी जाताना गाडीतच खाऊ. इथे शक्यच नाही. पाय निघत नव्हता पण घड्याळाचा काटा पण थांबत नव्हता. पुन्हा निवांतपणे भेटू या आश्वासनानंतर अखेर सगळ्यांना टाटा बाय बाय करून गाडीत बसलो.
गाडी मार्गस्थ झाली आणि बॉक्स उघडला तर काय, "बापरे!" दोघीही एकदमच ओरडलो. बटाटा वडा, मटार करंजी, दहीवडे आणि भरगच्च सुकामेवा घातलेला केशर शिरा... निःशब्द...
माहीमला पोचल्यापासूनचे एकेक क्षण अनमोल असल्याची जाणीव कायम माझ्या मनात असणार आहे.

मामबो_बाळाला_पत्र

 मामबो_बाळाला_पत्र

मामबो बाळा,
०७ जुलै २०१६ला जन्म झालेला तू, आता किती मोठा झालास रे?
काय म्हणू तुला?
लहान मूल म्हणू तर ते तू नक्कीच नाहीस.
शाळेच्या कित्येक इयत्ता तू केंव्हाच पार केल्यास.
महाविद्यालय म्हणू तर तू नुसतंच महाविद्यालयीन मुलांसारखी मजा मस्ती नाही करत. विद्यापीठ म्हणायचं तर थोडीशी कमी तुझ्यात नक्कीच आहे.
३२९ जणांच्या कुटुंबाचे सर्वात लाडके बाळ आहेस तू.
जेव्हा कोणी तुला अध्यात्माचे, संस्काराचे चार श्लोक शिकवतं तेव्हा या कुटुंबातल्या कित्येकांच्या मनात भक्तीभाव निर्माण होतो...
कित्येकजण तुला अनुभवाचे बोल सांगतं तर कोणी निसर्गातील आश्चर्य, विविध रूपं दाखवतं...
कोणी आपल्या आठवणीत रममाण होत असतं तर कोणी प्रलोभनातील जोखीम दाखवतं किंवा भविष्याची स्वप्नं ......
आपल्या व्यावसायिक अनुभवगाठी उलगडून दाखवतात तेव्हा त्यात घ्यावी लागणारी काळजी पण नकळतपणे सगळ्यांनाच शिकायला मिळते...
जुन्या संगीतात बागडायला लावताना तर सगळेचजण त्यात मनोमन थिरकतात...
काहींना आपल्या भ्रमणातील थरार तुला दाखवावेसे वाटतात तर कोणाला कथा, कादंबरीतून काल्पनिक जगत...
नाजुक साजूक प्रेमकविता आणि हटक्या लटक्या रागाचा तोरा तर प्रेमातच पाडतो...
कवितांबद्दल सांगताना तर तुला त्यांची कितीतरी रूपं दाखवतात...
वृत्तछंदातील कवितेतून शिस्त कळते तर मुक्तछंदात रमायला जमते...
प्रेमात आकंठ डुंबणे तर विरहात जीव नकोसा करणे...
विद्रोहात कानशीलं तापतील इतका संताप होणे तर कनवाळू कवितेतआजीच्या मायेने कुरवाळणे...
सगळे सगळे भाव या कविता दाखवत असतात...
साहित्याची विविध रूपं तुझ्या पटावर मांडताना, मांडलेली रूपं वाचताना जीव हरखून जातो...
बाळा, तू माझ्या जीवनात प्रवेश केलास, नाही नाही, मी तुझ्या विद्यालयात प्रवेश केला आणि माझं आयुष्यच बदललं बघ. माझंच काय आपल्या कुटुंबाचंच आयुष्य बदललं म्हण ना...
स्वत्व बीज सापडलं, स्वतःची ओळख रुजवली, त्याला कोंब फुटले...
विविधरंगी, विविधढंगी बगीचा तयार झाला...
समृद्ध, निखळ मैत्र मिळालं...
जीवनात आनंद शोधायचा मार्ग गवसला...
एक सक्षम बाळ घरात चिवचिवाट करून सुख, समाधान देतं ना तसं तू करत आला आहेस आणि करत रहाशील...
फक्त तुला दोनचार गोष्टी शिकवायच्या राहिल्यात रे. त्या शिकलास की तू अगदी अष्टपैलू बाळ होशील. त्याची उणीव खूप जाणवते. त्या साहित्यप्रकाराकडे तुला फारसं कोणी घेऊन गेलं नाही. नाही म्हणायला तुझ्या सानिध्यात राहून एक चित्रपट अवतरला पण तो एकच..
एकांकिका, नाटक, समीक्षा अशा काही प्रकारच्या वाटेला तुला नेलं नाही त्यामुळे अजूनही तू परिपूर्ण नाहीस असं वाटतं.
एक छोटीशी कथा दृश्यस्वरुपात कशी यावी याचं ज्ञान व्हायचं राहिलंय तुझं.
मान्य आहे मला, आपला समूह स्वतः लिहिलेल्या चार ओळी - कथा, कविता, लेख, विचार, अनुभव, आठवणी, मनोगते इतरांपर्यंत पोचवण्यासाठी आणि मराठीचा आस्वाद घेण्यासाठी निर्माण झालेला आहे पण कधीकधी वाटतं ना, यापलीकडे जावं, शिकावं, शिकवावं... काय सांगावं, तुझ्यासोबत लेखक होताहोता कोणी दिग्दर्शक आणि अभिनय निपुण होतील.
खूप जास्तवेळ लागतोय का रे वाचायला? हे कुटुंबच असं आहे, याच्या विविधगुणदर्शनाचे गोडवे गाऊ तितके थोडेच आहेत...
असाच बहरत रहा बाळा!

अनुभव_एका_पावसाचा

  अनुभव_एका_पावसाचा नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं, "अगं, किती छान ...