शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

मला उमगलेली संतवचने

 #राजेश्वरी किशोर 

#मला उमगलेली संतवचने 


कट्ट्यावर खूप छान छान, अभ्यासपूर्ण लेख आलेत. सगळ्यांचे उत्साह बघून मला पण काहीतरी लिहावे असं वाटू लागलं. विचार सुरू झाले पण काही केल्या कोणताच संत आजपर्यंत माझ्या आयुष्यात डोकावलेला आढळला नाही. 'संत वचने' म्हणजे तरी काय असतं? थोरामोठ्यांनी आपल्या वाणीने सांगितलेले सुविचार, जे पदोपदी आपल्याला आचरणात आणावेत असं त्यांना वाटत असतं. जेणेकरून समाजात बोकाळत चाललेली असुरक्षितता, गुंडगिरी, स्वार्थीपणा कमी होईल आणि सगळीकडे सुखसमाधान नांदेल.
माझ्या मनात नेहमीच शंका उत्पन्न होते, किती जण असा स्वामी, संत, गुरूंची वाणी ऐकून लक्षात घेऊन आचरणात आणत असतील? किती प्रयत्न केला तरी मूळ स्वभाव बदलू शकतो का? त्यासाठी मनापासून साधनेची गरज असते. एखादा मनात उतरवलेला विचार आपोआप आचरणात येतो.
मी वर्तमानात अशा कितीतरी 'तिला' बदलताना बघितलंय. संतांमुळे नाही पण काही साध्या साध्या शिकवणींमुळे.
मनातलं शब्दात उतरवता येईल का माहीत नाही पण प्रयत्न करते.
१. आपल्या आजारी, दिव्यांग मुलाला घेऊन आशा दवाखान्यात आपला नंबर कधी येतो त्याची वाट बघत बसली होती. आजाराने त्रासलेला मुलगा तिला स्वस्थ बसू देत नव्हता. थोडयाचवेळात आशाचा संयम संपला आणि तिने मुलाला एक जोराचा फटका दिला. अचानक बसलेल्या फटक्याने मुलगा दचकून एकदम शांत झाला पण आजूबाजूला बसलेले पेशंट तिच्याकडे बघू लागले. ती पण वैतागलेली होती. 'कधी सुधारणार पोरगं काय माहीत? माझ्याच नशिबी हे का आलं?' अशी काहीशी ती बडबड करू लागली. इतक्यात समोरून एक सुशिक्षित, वयस्कर बाई आल्या. दोन तीनच वाक्यं त्यांनी आशाला सांगितली आणि तिच्या आचार विचारांना बदलायला ती वाक्य पुरेशी पडली. "अग त्या अधू मुलाला मारून तुला काय मिळणार? तो असं का करतो त्याचा विचार कर. त्याला जन्म देताना नकळत तू कुठेतरी कमी पडलीस म्हणून तो असा झाला. तू त्याची सामान्य मुलाप्रमाणे पोटात पूर्ण वाढ करू शकली नाहीस ही गोष्ट पक्की मनात ठेव आणि यापुढे त्याला वाढवताना त्याची प्रगती कशी होईल हा विचार कर." क्षणात आशाच्या मनात वीज चमकल्यासारखी झाली आणि आशाला स्वतःची चूक समजली. पुन्हा त्या बाळाला कधीही फटके न मारता प्रेम आणि प्रेमच मिळालं.
२. पुष्पा आणि तिच्या नवर्याची सतत भांडणं होत असत. वयाची साठी जवळ आली, दोघेही उच्चशिक्षित पण क्षुल्लक कारणांनी एकमेकांना शिव्यांची लाखोली वहायचे. पुष्पाच्या शेजारणीला हे त्यांचं रोजचं भांडण ऐकवत नसे. ती पुष्पापेक्षा वयाने बरीच लहान होती पण समजूतदारपणा कमालीचा होता. एकदिवस पुष्पाचा मूड बघून बोललीच, "तुम्ही नवर्याला शिव्या देऊन नवरा सुधारतो का? नाहीना. पण त्यामुळे तुमचं तोंड खराब होतंय. तुम्ही बोलणार्या समोरच्या प्रत्येकाशी तसंच बोलू लागलाय. त्यामुळे तुमच्या जवळची माणसं दूर जाऊ लागलीत. त्यापेक्षा तुम्ही तुमचं बघा. शांत रहा आणि त्याला काय करायचं ते तो करतोच पण तुमच्या चिडण्यामुळे तो जास्तच तुम्हाला त्रास देतो. पुष्पाताई थोडा विचार करून बघा. मनातले वाईट विचार, जिभेवरचे वाईट शब्द झटकून टाका आणि मग बघा तुमचं आयुष्यच बदलेल." काय आश्चर्य, थोड्याच दिवसात दोघेही समाधानाने आपापल्या मार्गाने जात राहिले. दुरावलेली माणसं पुष्पाच्या जवळ येऊ लागली. पुष्पाची कामवाली शेजारणीला दुवा देऊ लागली.
३. मंगला नोकरीत वरच्या पोस्टवर काम करत होती. पण अति संशयी. हाताखालचे लोक तिला मुद्दाम त्रास देतात, नीट काम करत नाहीत म्हणून त्रासलेली असायची. शेजारणीच्या मुलाने छोटंसं कुत्र्याचं पिल्लू पाळलं तर हिला त्याचा पण राग आला. शेजारीण संध्याकाळी गप्पा मारायला आली की ही आजिबात सरळ बोलायची नाही. मग ते पिल्लू येताजाता तिचा रस्ता अडवायचं. त्याला बाजूला करायला शेजारीण किंवा तिचा मुलगा यायचा आणि अगदी प्रेमाने पिल्लाशी बोलायचे. मंगला ते बघून मनातून हळू हळू विरघळू लागली. शेजारीण सांगायची, "या प्राण्यांच्या अंगावरून हात फिरवला, त्यांच्याशी बोलताना त्याने शेपूट हलवताना बघितलं की आपल्याला त्याच्या डोळ्यात प्रेम दिसतं. एकदा तरी हा अनुभव घेऊन पहा, कळेल तुम्हाला." मंगला थोड्याच दिवसात त्या पिल्लावर प्रेम करायला लागली आणि मनातलं नैराश्य पार पळून गेलं. पिल्लाशी तिचं वागणं प्रेमाचं झालंच पण इतरांवर रागावणं पण कमी झालं.
४. एकदा स्वाती खूप नाराज होती, अस्वस्थ होती. अकारण फोनवरून तिची नणंद तिला बोलबोल बोलली होती. अतिच झाल्यावर स्वाती देखील बोलली. अगदी साध्या कारणावरून दोघींच्यात तणाव निर्माण झाला. तिला काय करावं ते कळेना. संतापाने, निराशेने तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते. योगायोगाने त्याच वेळी तिच्या मैत्रिणीचा फोन तिला आला. बोलता बोलता स्वाती मनातलं सगळं सांगून गेली, "स्वाती, समोरचा माणूस जेव्हा चिडतो ना तेव्हा समजायचं की, एखादी परिस्थिती त्याच्या हाताबाहेर गेली आहे. माणसाला राग येतो, जेव्हा परिस्थिती आटोक्यात येत नाही तेव्हा. तो राग तुझ्यावर निघाला इतकंच, असं समज. बघ असा विचार करून. तुझं तुलाच शांत वाटेल आणि वेळ जाऊदे थोडा, सगळं पुन्हा सुरळीत होईल." सहाजिकच दोन दिवसांनी माफीचा फोन स्वातीला आला आणि मनातले किल्मिश दूर झाले. तेव्हापासून स्वातीचे फारसे कोणाशी भांडण झाले नाही.
५. अलका निराश झाली होती. प्रत्येकवेळी सासरचे लोक आले की तिने सजवलेल्या घरातले आवडलेल्या वस्तु घेऊन जायचे आणि फार निराश व्हायची अलका. कोणाला कशाला नाही म्हणणे तिला जमत नव्हते पण नंतर तिला फार मनःस्ताप होत असे. एकदा तिने ही खंत तिच्या ताईला सांगितली, "अलका, त्यांना सांग, जे काय पाहिजे, आवडले ते घेऊन जा. फक्त माझा गुणी नवरा माझ्याजवळ ठेवा म्हणजे झालं. अग, या गोष्टी पुन्हा कधीही तू घेऊ शकतेस पण त्यांच्या वाकड्यात जाऊन नवरा गमावू नकोस." एखादं वादळ/कोसळता पाऊस शांत होतो तसं वाटलं अलकाला. पुन्हा कधीच त्यांच्या मागणीचा तिला त्रास झाला नाही.
किती साध्या साध्या गोष्टी असतात ना? विचार करण्याचा मार्ग बदलला की सगळी परिस्थिती बदलू शकते. मला नेहमीच वाटतं, मनात ताणतणाव असताना आपण योग्य विचार करू शकत नाही पण तेच जर दुसर्या समजूतदार व्यक्तिला आपलं संकट सांगितलं तर नक्कीच मार्ग निघू शकतो. आयुष्य सुकर होऊ शकते.
त्यावेळी आपलं आयुष्य सुकर करणार्या या घटना कायमच्या मनावर कोरल्या जातात.
मी आजिबात म्हणत नाही ही संत वाचने आहेत, पण अशा कित्येक लोकांचे बिघडलेले संसार सुधारताना बघितलेत.
संत तरी काय सांगतात? जनामनात आनंद, सुख नांदावं हीच त्यांची मनोकामना असायची ना?
कोणी संत बनू नका पण समोरच्याची अडचण समजून घेता आली पाहिजे. त्यातून त्याला बाहेर काढता येईल का ते पहायला जमलं पाहिजे असं वाटतं.
मग सांगा ही छोटी छोटी, साधी साधी वाक्ये आणि सामान्यांचे अनुभवाचे बोल कुठल्या संत वचनांपेक्षा गौण कशी मानायची ?
राजेश्वरी
२९/०४/२०२१


आतलं प्रेम

 #राजेश्वरी किशोर

#आतलं प्रेम 



परवा किशोर आंबे घेऊन आला. सगळे आंबे मी नीट गवतात रचत होते. एक आंबा मात्र विचित्र आकाराचा होता. तो हातात घेऊन मी बघत होते. कोणत्याच बाजूने तो आंबा वाटत नव्हता. ओबडधोबड बटाट्यासारखा.
"अरे, असला कसला आंबा आणलास. जरा नीट निवडून तरी आणायचे ना आंबे."
"तो खास तूझ्यासाठी म्हणून आणला. कापून तरी बघ."
बघूया गोड निघतोय का म्हणून मी कापला. फोडी पण नेहमीसारख्या कोयीच्या सपाट बाजूकडच्या दोन दोन आणि बाजूच्या दोन अशा होईचनात. पण चवीला अतिशय गोड, स्वादिष्ट असा तो होता.
शेवटी कोय खायचं काम माझं असतं नेहमी. दोघांनाही कोय खात बसायला आवडत नाही मग काय मी बिचारी साफ होईपर्यंत खात(---) बसते. या आंब्याची कोय खात गेले आणि गंमत म्हणजे ती निराळीच पण देखणी निघाली. पूर्ण साफ झाल्यावर बघितली तर काय, अगदी प्रेमाचे चिन्ह, बदामाच्या आकाराची कोय...
वरून ओबडधोबड दिसणाऱ्या आंब्याची कोय मात्र देखणी बदामी...
कोणाला एखाद्या गाजर, बटाटा, पपई मध्ये गणपती दिसतो तर कोणाला शिवलिंग...
मला मात्र कोयीत लपलेलं प्रेम दिसलं...
कोय हातात धरून मी विचार करत राहिले...
बऱ्याचदा आपण एखाद्याचे बाह्य रूप, रंग बघून आपले मत नोंदवतो, अपेक्षा ठेवतो पण तसं असतंच असं नाही...
कदाचित त्याचे अंतर्मन खूप प्रेमळ असेल ही. पण ते कळण्यासाठी आपल्याला त्यात डोकावता आलं पाहिजे. खरं ना? दिसतं तसं नसतं, हेच खरं.
"बघ, याला म्हणतात खरं प्रेम. ते वरून कधी दिसून येत नाही."
"हो रे बाबा. खरंय तुझं. अंतर्मनात डोकावल्याशिवाय खरं प्रेम सापडत नाही."
राजेश्वरी
०५/०६/२०२१
May be an image of food

हे असं कसं?

 #राजेश्वरी किशोर

#हे असं कसं? 



काल बाबांशी बोलताना कळलं, "अगं भिकु काका गेले. खूप दिवसांपासून आजारी होते. आजाराचं नेमकं निदान होत नव्हतं. मुलगी उर्मिला आपल्या नवर्याबरोबर अमेरिकेत गेली. मुलगा सून त्यांच्याबरोबर रहात होते पण मुलीच्या आठवणीने व्याकूळ व्हायचे. सध्याच्या करोनाच्या काळात मुलीला पण इकडे येता आलं नाही. वय पण फार नव्हतं, जेमतेम पंच्याहत्तर असेल."
माझे वयाची नव्वदी पार केलेले बाबा सांगत होते.
ऐकल्यापासून माझ्या डोळ्यासमोर भिकुकाकांच्या बरोबर घालवलेले सगळे क्षण आठवू लागले.
सदाशिव काका देसाई गावतलं एक बडं प्रस्थ. भरपूर बागाईत शेती. मोठा चौसोपी वाडा. मागे परसात गाई म्हशींचा गोठा. घरचीच जीवा शिवाची बैल जोडी. वाड्याच्या अंगणात आमराईत लावलेली देखणी बैलगाडी. कित्येकदा आम्ही सुट्टीत गेलो की त्या तिरक्या उभ्या केलेल्या गाडीवरून घसरगुंडी खेळायचो. सदाशिवकाकांना चार मुलं. सर्वात मोठे भिकुकाका. ऊंचेपुरे, गोरे, सरळ नाक, कुरळे केस, डोळे बोलके असल्याने देखणे होते अगदी. कोणालाही पहाताच भुरळ पडेल असे. पदवीधर झाले आणि पंचायत समितीत नोकरीला लागले. त्यांचे दोन भाऊ कमी शिकले आणि घराची शेती पाहू लागले. चौथा भाऊ सहकारी बँकेत लागलेला. दोघेजण गाव सोडून शहरात आलेले. आमची गावातली शेती पण त्यांचे भाऊच बघायचे. त्यामुळे घरी सगळ्यांचंच येणं जाणं असायचं. सुट्टीला आंबे खायला, उसात मधे मधे लावलेले हरबरे, ओल्या शेंगा खायला, गरम गरम बनत असलेला गूळ गुऱ्हाळात काहिलीशेजारी बसून काठीला गुंडाळून खायला मजा यायची. अवीट गोडीचं लॉलिपॉप होतं ते. सगळ्या सगळ्या आठवणी ताज्या होऊ लागल्या.
भिकुकाकांची मुलगी उर्मिला कायम 'ताई ताई' करून माझ्या मागे असायची. उर्मिलाची आठवण आली आणि मला ती घटना एकदम आठवली.
भिकुकाकांचं लग्न उमाकाकूशी झालं आणि त्यांनी आमच्या जवळच रहायला घर घेतलं. उमाकाकू पण नावाप्रमाणे नाजुक देखणी होती. विशेषतः तिचा आवाज फार गोड होता. गावाकडची गाणी पण ती फार छान म्हणायची. कायम माझ्या आईकडून नवीन नवीन पदार्थ शिकायची आणि करून आम्हा मुलांना खायला द्यायची. मुलांच्यात अगदी रमून जायची. पण तब्येतीने मात्र जरा नाजुकच होती. लग्न होऊन दीड दोन वर्षं झाली असतील आणि तिला दिवस गेले. सुरुवातीपासूनच तिला ते गरोदरपण त्रासदायक झालं आणि त्यातच ती आणि न जन्मलेलं बाळ सगळ्यांना सोडून गेले. वर्षभर भिकुकाका सैरभैर झाले होते. ना खाण्याची शुद्ध ना कामाची. नेहमी टीपटॉप रहाणारे काका एकदम गबळ्यासारखे राहू लागले. कामात लक्ष देईनासे झाले. हातातली कामं वेळेवर होत नाहीत म्हणून साहेबांची ओरडणी बसू लागली. मात्र संध्याकाळ झाली की न चुकता बाबांना भेटायला यायचे. बर्याचदा शांत बसून असायचे, कधीतरीच मनातलं बोलायचे. एकदिवस त्यांचे वडील, सदाशिवकाका, बाबांना भेटायला आले. त्यांच्या माहितीतली एक मुलगी स्थळ म्हणून घेऊन आले होते. भिकुकाकांची समजूत बाबांनी घातली आणि दुसर्यांदा भिकुकाका बोहोल्यावर चढले. लीलाकाकू गोरी असली तरी दिसायला कशीतरीच होती. नाक बसकं होतं, गालावर कपाळावर देवीचे व्रण उठून दिसत होते. डोळे बारीक होते आणि विशेष म्हणजे आवाज एकदम घोगरा होता. पहिल्या देखण्या उमाकाकूला बघायची आम्हाला सवय झाली होती पण ही लीलाकाकू काकांशेजारी उभी राहिली की अगदीच विजोड दिसायची. स्वभावाने मात्र खूपच शांत आणि कामसू होती. तब्येतीने दणकट/थोराड असल्याने भराभर कामं करायची. तिचं बोलणं मात्र अगदीच खेडवळ वाटायचं आम्हाला.
लग्नाला जेमतेम दोन महिनेच झाले असतील आणि काका घरी आले. बाबांशी काहीतरी गंभीर बोलत होते. आम्हाला नीटसे ऐकू येत नव्हते आणि आम्हाला त्यात फार रस देखील नव्हता. बाबांनी त्यांना काहीतरी उपाय सांगितला आणि ते निघून गेले. दोन दिवसांनी पुन्हा भिकुकाका आले. परत दोघांची खलबतं सुरू झाली.
ते गेल्यावर बाबा आईशी बोलत असताना कळलं की, रात्री झोपल्यावर लीलाकाकू झोपेतच बडबड करायची. ती काय बोलली हे तिला सकाळी उठल्यावर कळायचे नाही, लक्षात नसायचं पण ती जेव्हा झोपेत बोलायची तेव्हा तिचा आवाज अगदी उमाकाकू सारखा असतो असं भिकुकाका सांगायचे. कधी ती तिच्या आवडीचं गाणं गुणगुणायची किंवा कधी घरच्यांच्याबद्दल बोलायची. मला सोडून जाऊ नका, मला जवळ घ्या म्हणायची. काका हलवून लीलाकाकूला जागं करायचे तेव्हा ती तिच्या घोगर्या आवाजात बोलायची आणि तिला काहीच माहीत नसायचं. बाबांनाही हा असा अनुभव पहिल्यांदाच ऐकायला मिळत होता. 'आत्मा असतो' किंवा 'अंगात येणं' यावर कधी विश्वास नसल्यामुळे ही घटना खरी असेल असं सुरूवातीला वाटायचं नाही. भिकुच्या मनाचे खेळ आहेत असं बाबा म्हणायचे. पण मग दर दोन तीन दिवसांनी भिकुकाका सांगायचे. तेव्हापासून ते नावंनाव घाबरलेले दिसू लागले.
बाबा एकदिवस त्यांना म्हणाले, "घाबरून जाऊ नका, विचारा तिला, तू तर मला सोडून गेलीस, आता माझं आयुष्य का खराब करते आहेस? का माझ्या आयुष्यात विष कालवते आहेस? तुला माझ्याकडून पाहिजे तरी काय आता? तू म्हणशील ते मी करतो पण असं रोज रात्री माझ्यासमोर येत जाऊ नकोस."
कितीतरी दिवस तर भिकुकाका घाबरून काही बोलू शकले नव्हते. पण मग एक दिवस धीर करून ते तिच्याशी बोलले. दुसर्या दिवशी बाबांना जरा खुशीतच येऊन सांगत होते.
"मी बोललो उमाशी, तिने पण शांतपणे माझं बोलणं ऐकून घेतलं. पण तिची मागणी मात्र मला पूर्ण करणं जमत नाहीये."
"काय म्हणतेय ती? तिला काय पाहिजे?" बाबा विचारत होते.
"तिला माझी मुलगी म्हणून पुन्हा जन्म घ्यायचा आहे. मगच मी तुम्हाला त्रास देणार नाही म्हणाली."
"इतकंच ना मग काय हरकत आहे?"
"अहो, कसं सांगू तुम्हाला, माझं हे दुसरं लग्न मी माझ्या मनाविरुद्ध केलंय हो, मला लीला आजिबात आवडत नाही. इतके दिवस झाले तरी मी अजून तिला हात देखील लावलेला नाही. कोणत्याच गोष्टीत ती माझ्या अपेक्षेप्रमाणे नाहीये. स्वयंपाक आणि कामं नीटनेटकी करते इतकाच काय तो गुण आहे तिच्याकडे."
त्या काळात म्हणजे चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी सहचर आवडला नाही म्हणून सोडून देण्याचे विचार कोणाच्या मनाला शिवलेले देखील नव्हते. आवडत नाही म्हणून सोडून दिलं असं कधी होत नव्हतं.
बाबांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि भिकुकाकांची ते समजूत घालू लागले. माझे बाबा एक चांगले समुपदेशक आहेत त्यामुळे गावातले कित्येकजण त्यांच्याकडे अडचणी घेऊन यायचे हे आम्ही लहानपणापासूनच बघत आलेलो आहोत. तसं त्यांनी भिकुकाकांना पण व्यवस्थित समजावले. किती पटलं, पटलं की नाही ते कळलं नाही पण वर्षभरातच लीलाकाकूला एक गोड मुलगी झाली. काकांनी हौसेने तिचे नाव उर्मिला ठेवले आणि घरात ते तिला 'उमा' म्हणून हाक मारायचे. उर्मिला अतिशय नाजुक देखणी होती. गोड बोलायची आणि लहानपणापासूनच गोड गायची. तिच्यानंतर काकुला एक मुलगा पण झाला.
मधेच कधीतरी बाबांनी एकदा, 'उमाकाकू पुन्हा बोलायला आली होती का?' असं विचारलं पण होतं. पण काकांनी नकार दिला. उर्मिलाच्या जन्मानंतर तिचा आवाज मी कधीच ऐकला नाही म्हणायचे.
उर्मिला चांगली शिकली. नवरा देखील तिला अगदी मनासारखा मिळाला. ती पण त्याच शहरात असल्यामुळे भिकुकाकांना नेहमीच भेटायला यायची. सगळं काही सुरळीत सुरू होतं आणि अचानक उर्मिलाच्या नवर्याला परदेशी जायची संधी मिळाली. नंतरची काही वर्षं त्यांच्या प्रगतीत, कौतुकात निघून गेली. पण गेली दोन वर्षे उर्मिलाला भारतात यायला जमलं नाही. फोनवर बोलणं व्हायचं पण आता आपल्याला उर्मिला कधीच भेटणार नाही या निराशेच्या गर्तेत भिकुकाका खचून गेले. उर्मिलाचा फोन यायचा तरी त्यात समाधान व्हायचं नाही, त्यांना तिच्या भेटीची ओढ लागली होती.
हे जग सोडून जाताना पण 'उमा उमा' म्हणतच गेले असं लीलाकाकू सांगत होती.
(पूर्वी घडलेल्या या घटनेचा विचार केला की मला अनेक प्रश्न पडतात, नेमकं काय झालं असेल? काकांच्या मनातलं उमाकाकूवरचं प्रेम सारखी तिची आठवण करून देत असेल की अनिच्छा असली तरी संसारात पुन्हा पडलं पाहिजे हे मनातले विचार त्यांच्या मनात असे वादळ निर्माण करत असेल? खरंच लीलाकाकू उमाकाकूच्या आवाजात बोलत असेल की काका हे सगळं स्वप्नात पहात असतील? उर्मिलाचा जन्म झाल्यावर समाजाला म्हणायला त्यांचा संसार सुखाचा दिसला की खरंच काका संसारात फारसे रमलेच नाहीत?
'असं का?' हा प्रश्न मात्र निरुत्तरीतच राहिला. समाजासाठी मात्र त्यांचा संसार सुखाचा होता हे नक्की.)
राजेश्वरी
२९/०९/२०२१

करोनानुभव

#राजेश्वरी किशोर

#करोनानुभव 



"कशी तब्येत आहे ग दोघांची आता?"

"बाकी ठीक आहे पण मला कालपासून वास येत नाहीये."
"तो गेलेला वास येईल दोन तीन दिवसात. काळजी घे."
काल मैत्रिणीचे आणि माझे असे चॅटिंग झाले.'हे काय वास येत नाही तर काळजी घे' असं का म्हणतीये मी, असं नक्कीच तिला वाटलं असणार.
संध्याकाळी दुसर्या मैत्रिणीचा फोन, "अगं, कसे आहात तुम्ही सगळे?"
"आम्ही बरे आहोत आता. तुम्ही ठीक ना?"
"आता ठीक आहोत ग. मागच्या माहित्यात मात्र धाबं दणाणलं होतं."
"का गं?"
"कसला वास येत नव्हता की चव लागत नव्हती. मी तर नुसता कापुर चुरुन नाकात घालून बघायचे पण उपयोग शून्य. फार घाबरले होते मी. काहीही खाल्लं तरी सगळं सारखंच लागायचं. पुठ्ठा खाल्ल्यासारखं. ना मिठाची चव, ना तिखटाची ना साखरेची. नाक, जीभ सगळं बधिर झाल्यासारखं. कान तेवढे शाबूत होते इतकंच."
------------
आजकाल असे संवाद बहुतेक सगळ्यांनी ऐकले असणार. मी कितीही विसरू म्हणता परत परत माझा अनुभव मला आठवायला लागतो मग. कारण मला त्यावरून इतरांना सावध करावं असंच वाटतं. आठवलं की अजूनही अंगावर काटा येतो.
कसं कळलं असेल मला वास येत नाहीये ते? दूध उतू गेलं म्हणून की भाजी जळली म्हणून? नाही नाही... असं काही झालं नाही.
एप्रिल महिन्याचा मी म्हणणारा उन्हाळा होता. दारं खिडक्या संध्याकाळी उघडल्या की बाहेरच्या हिरव्यागार वनराईत दिवसभर आडोशाला बसलेले डास झुंडीने घरात शिरायचे. मग मी आवडीने घेतलेला मातीचा तवा घरात आणायचे. भाकरीसाठी गॅसवर वापरता न आल्याने त्याचा उपयोग आता डासांना पळवण्यासाठी मी करते. त्यात आजूबाजूला मुबलक असणारा कडूलिंबाचा पाला, भाज्यांचे वाळवलेले अवशेष, कापुर वगैरे साहित्य तव्यावर घालून त्याला पेटवायचं. थोडं पेटलं की आग विझवून धूर करायचा आणि थोडा थोडा वेळ सगळ्या खोल्यात तो तवा फिरवायचा असा माझा रोजचा उद्योग असायचा.
त्या आठवड्यात माझा रिपोर्ट positive आल्यामुळे माझी रवानगी वेगळ्या खोलीत झाली होती. तसं तर बहुतेक सगळेच जण positive होतो पण माझा अधिकृत दाखला आला होता.
त्या दिवशी रात्री शेवटी तवा मी माझ्या खोलीत ठेवला. ताट वाढून आणून माझ्या खोलीत बसून जेवले आणि गोळ्या घेऊन दिवा बंद केला. डास इकडून तिकडे जायला नकोत म्हणून खोलीचं दार बंद केलं. डोक्यावरचा पंखा रात्रंदिवस फिरून फिरून दमला होता. त्याचा वारा डासांना दूर घालवू शकत नव्हता. घरच्या दारावर quarantine चा फलक लागल्यामुळे पुढचे १९ दिवस तरी कोणी दुरुस्तीला येणार नव्हतं.
माझं दुखणारं गरम अंग कोणत्याच उपायांनी शांतावत नव्हतं पण झोपायला पाहिजे म्हणून डोळे मिटले मी. विझू विझू लागलेला तवा डोक्याशी असलेल्या टेबलाखाली सरकवला आणि मी डोक्यावरुन पांघरुण घेऊन झोपेची आराधना करू लागले. तास दीड तास गेला असेल, मला खोलीत तड तड तड तड आवाज येतोय असं जाणवलं. हा कसला आवाज येतोय म्हणून डोळे उघडले. रोजची सवयीची खोली नसल्याने दिव्याचे बटण कोणत्या बाजूला आहे ते लक्षात येईना. जवळ असलेल्या मोबाईलची बॅटरी लावली आणि दिव्याचं बटण शोधायला लागले. सगळीकडे धूसर धूसर दिसत होतं. मी घाबरले. आता हे काय नवीन? करोनामुळे चव आणि वास जातो माहीत होतं, मात्र दृष्टी पण? उठून कसाबसा लाइट लावला आणि खोली बघून मी हादरलेच. पूर्ण खोली धूराने व्यापून गेली होती. तव्यात विझू लागलेली धग आत्ता पेटतेय की काय अशी परिस्थिती होती. बंद खोलीत कोंडलेला तो धूर मला कसा कळला नाही याचं आश्चर्य वाटू लागलं. जवळच असलेल्या बाटलीतलं पाणी तव्यावर ओतून बाटली रिकामी केली. मास्क लावला आणि किशोरला उठवायला दुसर्या खोलीत गेले. त्याने माझ्या खोलीत पाय ठेवताच त्याला ठसका लागला. त्याने नाकातोंडावर हात धरला आणि आधी मला बाहेर जायला सांगितले. एरवी उदबत्तीचा देखील धूर सहन न होणारी मी आणि या धुराचा थांगपत्ताही मला न लागावा याचं नवलच वाटू लागलं. सगळ्या बंद केलेल्या खिडक्या उघडल्या, धूर बाहेर जायला पंख्याचा तर उपयोग होतच नव्हता. किशोरने तवा उचलून बाहेर गच्चीवर नेऊन आपटलाच. त्याला आधीपासूनच तो प्रकार आवडत नव्हता, रिस्की आहे म्हणायचा. पण मला ते coil लावण्यापेक्षा हे कमी घातक आहे असं वाटायचं. मग आलापने रूम फ्रेशनर स्प्रे सगळीकडे मारला आणि मी थोडावेळ मन शांत करायला बाहेरच्या खोलीत जावून बसले. खोलवर श्वास घेऊन देखील मला कसलाच वास येत नव्हता. काहीच सुचत नव्हतं. दिवसभर तर भाजीचा आणि इतर वास आले की नाही याचा विचार मनात आणत गेले. कळायला काहीच मार्ग नव्हता. नाक आणि आजूबाजूला सगळं बधिर झाल्याचं जाणवत होतं. दात काढताना इंजेक्शन दिल्यावर कसं बधिर होतं ना तसं वाटत होतं नाकाभोवती. RTPCR रिपोर्ट आल्यावर ऑक्सीजन ९९ आहे, ताप आणि थोडी अंगदुखी इतक्या थोडक्यात निभावलं असं वाटत असतानाच हा प्रसंग ओढवला होता. झालेल्या प्रकारापेक्षा अघटित घडू शकणार्या प्रसंगाच्या विचाराने मन धास्तावलं.
तेव्हापासून कोणी positive आहे असं सांगितलं की वासाची काळजी घ्या असं मी आपसूकच सुचवते.
राजेश्वरी
२७/०९/२०२१

पाचोळा - कुसुमाग्रज

कविता रसग्रहण    पाचोळा - कुसुमाग्रज आडवाटेला दूर एक माळ तरू त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगूनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास उषा ये...